माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


नास्तिक

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....

- संदिप खरे
ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
- मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्धा वडावर !
- मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
-मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
- तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
- मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.
प्रेम करावे असे, परंतू....

हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.

प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.

प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू....
प्रेम करावे हे कळल्याविण.
एवढे लक्षात ठेवा

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥
तरुणपणी

तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये
लघवी केली.

आणि आपले उर्वरित आयुष्य
त्यामुळे
दर्याची उंची किती वाढली
हे मोजण्यात खर्ची घातले.

(विरूपिका)
वेड्याचे प्रेमगीत

येणार तर आत्ताच ये;
येणार तर आत्ताच ये;
उद्या तुझी जरूर काय?
... आज आहे सूर्यग्रहण;
आज मला तुझा म्हण;
उद्या तुझी जरूर काय?
बेकारीच्या खुराकावर
तुझी प्रीती माजेल ना?
सूर्याच्या या तव्यावरती
चंद्राची भाकर भाजेल ना?
... भितेस काय खुळे पोरी;
पाच हात नवी दोरी
काळ्या बाजारात उधार मिळेल.

सात घटका सात पळे
हा मुहूर्त साधेल काय?
संस्कृतीचे घटिकापात्र
दर्यामधे बुडेल काय?
... उद्याच्या त्या अर्भकाला
आज तुझे रक्त पाज;
... भगवंताला सारी लाज.
येणार तर आत्ताच ये;
अंधाराच्या मांडीवरती
जगतील सात, मरतील सात;
आकाश आपल्या डोक्यावर
पुन:पुन्हा मारील हात.
... भरल्या दु:खात रडू नये;
येणार तर आत्ताच ये;
येणार तर आत्ताच ये;
उद्या तुझी जरूर काय?
असेल जेव्हा फुलावयाचे

असेल जेव्हा फुलावयाचे
तुझ्याचसाठी फुल सखे तू
फुल सखे तू फुलण्यासाठी;
फुल मनातिल विसरून हेतू.

या हेतूला गंध उद्याचा;
या हेतूची किड मुळाला;
फुल सखे तू फुलण्यासाठी;
या हेतूचा चुकवून डोळा.

फुल सखे होउन फुलवेडी;
त्या वेडातच विझव मला तू.
विझव नभाच्या आळवावरचे;
स्थळ-कालाचे हळवे जंतू.
जगण्यामध्ये ब्रम्हानंद

बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.

सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रम्हानंद.
डोळ्यातल्या डोहामध्ये

डोळ्यांतल्या डोहामध्ये
खोल खोल नको जाऊ;
मनांतल्या सावल्यांना
नको नको, सखे, पाहू;

जाणीवेच्या गाभा-यात
जाऊ नको एकटीने ;
गेलेल्यांना साधले का
व्यथेवीण मागे येणे ?

व्यथेच्या या पेल्यांतून
सत्याचे जे घेती घोट,
पूस त्यांना कसा कांपे
पिता पिता धीट ओठ !
सहानभूती - कुसुमाग्रज
सहानभूती

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकान्ची होय दाट गर्दी

प्रभादिपान्ची फ़ुले अन्तराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोपर्याशी गुणगुणत अन अभन्ग
उभा केव्हाचा एक तो अपन्ग

भोवतीचा अन्धार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसान्चा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दिना त्या उभारुनी उर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिन बन्धू वाट

आणी धनिकान्ची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात.
मौन - कुसुमाग्रज


शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.

(मुक्तायन)
दोन याचक - कुसुमाग्रज

कुसुमाग्रजांची ही कविता त्यांच्या इतर कवितांइतकी जरी गाजलेली नसली, तरी त्यांच्यासारखीच अव्वल दर्जाची आहे, यात शंका नाही. एका घटनेचे, त्यांनी या कवितेतून अगदी साध्या आणि ओघवत्या भाषेत चित्रदर्शी वर्णन केले आहे. पोटासाठी वेगवेगळ्या प्रकारे शरीर विकणारे आणि जगाच्या खिजगणतीतही नसणारे भिकारीण आणि सैनिक असे दोन अनामिक जीव एकत्र येतात आणि आपापल्या भुका शांत करतात. दोन्हीमध्ये अनैतिक असे काहीच नाही, असेलच तर ती आदिम काळापासून सोबत करणारी भूक - शरीराची किंवा पोटाची.

दोन याचक

मलीन खाकी गणवेषातिल, सैनिक तरणाताठा कोणी
नाव? कशाचे नाममात्र ते बाहुवरची बघा निशाणी

शरीर विकुनी पोटासाठी एक थेंब हा सरितेसंगे
प्रवाह नेई तिकडे जाई धावत वाहत मरणामागे

मैदानावर पुढे छावणी फुगीर डेरे अवतीभवती
कबुतरांचा जणू थवा हा थकून बैसे जमिनीवरती

त्या गर्दीच्या सीमेवर हा तरूतळी बसला एकाकी
गर्द सावली, गाढ शांतता, वाराही पद हळुच टाकी

दुर्लभ वेळा असते असली ऐकत होता संथ पडोनी
खाकीखाली धडधडणाऱ्या व्यक्तित्वाची करूण कहाणी

कुणी भिकारीण आली तेथे, नाव? कशाचे नाममात्र ते
होते नवथर त्या नवतीला झाकाया नच वस्त्रही पुरते

कळकट चोळीच्या चिंधीतून स्तन डोकावत उंच सावळे
तलम अनावृत दिसे कातडी लाचारीचे विशाल डोळे

उभी राहिली समोर त्याच्या उपसत कंठामधुनि ताना
बोलपटातील परिचित गीते, म्हणे अखेरीस काही द्या ना

काही द्या ना जीभ न केवळ शरीर अवघे होते मागत
ते डोळे, ते स्तन, ती मांडी, सारे उदरास्तव आक्रोशत

शूर शिपाई किंचित बुजला संकोचाची छटा मुखावर
खिशात गेले हात परंतु, नजरेतुन ओसंडे काहुर

त्यासही होते हवे काहीसे, कसे तरी ते कळवे; कळले
दुनियेपासून तुटलेले ते, दोन अनामिक जवळी आले

दूर जरा दरडीच्या खाली मच्छरदाणी करिती पर्णे
नीरवतेवर मुद्रित झाले विविध भुकांचे एकच गाणे, एकच नाणे!
निरोप - कुसुमाग्रज

( पुढील कविता ही माझा मित्र आणि ह्या संग्रहाचा सह-संकलक - किरण रानडे - ह्याच्या आईच्या स्मरणानुसार उद्धृत करीत आहे. जाणकारांकडून सुधारणांची अपेक्षा आहे. माझे श्वसुर - श्री. शशिकांत दात्ये - ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्या कवितेची पार्श्वभूमी ही फाळणीच्या काळात पूर्व पाकिस्तानात घडलेल्या एका प्रसंगाची आहे. पूर्व पाकिस्तानातून फाळणीनंतर भारतात यायला निघालेल्या एका विमानात एक माता आपल्या कोवळ्या मुलाला सोडून देते, असा काहिसा तो प्रसंग होता. ह्याही संदर्भात कुणा जाणकार रसिकांस काही माहिती असेल तर ती अवश्य द्यावी.)

गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!
मातीची दर्पोक्ति - कुसुमाग्रज

घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य
त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य,
उन्माद चढे, तो दर्प दर्वळे भोती
थरथरा कापली वर दर्भाची पाती
ते सुस्त धूलिकण गाउ लागले गीत

कोलाहल घुमला चहूकडे रानात-
अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
दर्पणी पाहु द्या रमणि रूप दर्पात
वा बाहू स्फुरु द्या बलशाली समरात
पांडित्य मांडु द्या शब्दांचा आकांत

ते रूप, बुद्धि ती, शक्ति, आमुची भरती,
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले
कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले
कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले
स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
पाहून हासु ये तुमचे ताजमहाल
अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ?

शेकडो ताजही जिथे शोभले काल
ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
धनवंत असू द्या, असु द्या दीन भिकारी
कुणि संत असू द्या वा पापी व्यभिचारी
इकडेच वाहते सर्वांची रहदारी
हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ति

स्वर्गीय मंदिरें घ्यायाला विश्रांति
लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीति
त्या व्याकुल मतिला इथेच अंतिम शांती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
निर्माल्य

होता मोहरला व संत वितरी मार्गावरी तो फुले
होते धुंद सुवास ते चहुकडे विश्वामधे दाटले,
स्वप्नांच्या कमली अलीपरि दडे रात्री सुके अन्तर
आणि पंख उभारवून दिवसा झापू बघे अम्बर !

वेशी दृष्टिपथात तू जणु उभी प्राचीवरी हो उषा
झाला आरुण जीवनौघ, भरला आल्हाद दाही दिशा
मूर्ती मोहक गौर, गोल सुख अन् किंचित निळ्या लोचनी
वाहे मन्थर आणि जीवनमयी त भावमन्दाकिनी !

साधी वेषतर्‍हा तयातहि खुले ती आकृती लालस
डोळ्यातूनच भावबन्ध जडले-प्रीती असे डोळस !
जाण्याला निघसी अचानक पुढे, व्याकूलसी पाहुनी,
गंगा लोपुनी गर्जना करित तो सिंधूच नेत्रांतुनी !

आणी गेलिस तू-वसन्तहि सखे गेला तुझ्या संगती,
पुष्पातील उडून गंध उरले निर्माल्य हे भोवती !
माझे जगणे होते गाणे

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे
जरि या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे

जरि या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे
हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे
त्या बावऱ्या कळीने ते स्वप्न पाहिलेले
वेड्या क्षणास एका सर्वस्व वाहिलेले
छळतो अजून जीवा तो लाजरा गुन्हा रे
ते श्वास कापरे अन्‌ आभास सावल्यांचे
रे चांदणेच झाले डोळ्यांत बाहुल्यांचे
अन्‌ सूर सूर झाल्या त्या सर्व भावना रे
नाही विचार केला, मी पाहिले न मागे
आले तुझ्याकडे मी तोडून सर्व धागे
का घालिता उडी ही घर आठवे कुणा रे ?
मी घातली उडी हा नच दोष रे कुणाचा
चुरडे कळी मनाची हा खेळ प्राक्तनाचा
स्वप्ने विरुन येते हातात वंचना रे
हरवून स्वप्न गेले, अश्रूच आज जागे
वेडी तुझी कळी ही बघते वळून मागे
का पापण्यांत मिटते निःशब्द वेदना रे ?
गीत – मंगेश पाडगावकर
आतां उजाडेल !

खिन्न आंधळा अंधार
आता ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल
आतां उजाडेल !
शुभ्र आनंदाच्या लाटा
गात फुटतील आतां
मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल
आतां उजाडेल !
वारा हसेल पर्णांत
मुग्ध हिरवेपणांत
गहिंवरल्या प्रकाशी दहिंवर मिसळेल
आतां उजाडेल !
आनंदात पारिजात
उधळील बरसात
गोड कोवळा गारवा सुगंधांत थरालेल
आतां उजाडेल !
फुलतील नकळत
कळ्यांतले देवदूत
निळा-सोनेरी गौरव दिशांतून उमलेल
आतां उजाडेल !
निळें आकाश भरून
दाही दिशा उजाळून
प्रकाशाचें महादान कणाकणांत स्फ़ुरेल
आतां उजाडेल !
आज सारें भय सरे
उरीं जोतिर्मय झरे
पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल
आतां उजाडेल !
- मंग॓श पाडगांवकर
मी बोलले न काही नुसतेच पाहिले

मी बोलले न काही नुसतेच पाहिले
हृदयात दाटलेले हृदयात राहिले
परतून हाय जाण्या ओठांत शब्द आले
डोळ्यांतले इषारे डोळ्यांत कैद झाले
मी बंद पापण्यांनी हे सर्व साहिले
देऊन सर्व काही नाही दिलेच काही
ज्याला हवे कळाया कळलेहि त्यास नाही
माझ्याच अंतरी मी हे फूल वाहिले
निःशब्द आसवांनी समजाविले मनाला
की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला
माझ्याच मी मनाशी हे गीत गायिले
गीत – मंगेश पाडगावकर
कुठलेच फूल आता मजला पसंत नाही

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही
हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही
जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही
मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही
थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्‍या कसलीच खंत नाही
मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही
दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)
मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!
– एल्गार, सुरेश भट
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !
चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो !
सल जुनेच सलता सलता सुखावून गेले !
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले !
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो !
किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो !
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो !
सर्व संग सुटले; माझा मीच संग झालो !
ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी !
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी !
तरू काय ? इंद्रायणिचा मी तरंग झालो !
कुठे दिंड गेली त्यांची कळेना बिचारी !
मी इथेच केली माझी सोसण्यात वारी !
’पांडुरंग’ म्हणता म्हणता ’पांडुरंग’ झालो !
गीत – सुरेश भट
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !
असेच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी इथे हळुच हुंगतो !
अशीच रोज अंगणी
लवून वेच तु फुले,
असेच सांग लजुनी
कळ्यांस गूज आपुले;
तुझ्या कळ्या,तुझी फुले इथे तिपुन काढतो !
अजून तू अजाण ह्या,
कुवार कर्दळीपरी;
गडे विचार जणत्या
जुईस एकदा तरी :
“दुरुन कोण हा तुझा मरंद रोज चाखतो?”
तसा न राहिला अता
उदास एकटेपणा;
तुझी रुपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा;
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !
- सुरेश भट
काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो!

काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो!
मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो!
चारचौघांसारखे मज बोलणे जमलेच नाही,
सांग तू आता शहाण्या, काय मी बरळून गेलो?
मी अता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे…
जन्मठेपेतून माझ्या आज मी निसटून गेलो!
का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो?
मी तुम्हासाठीच तेव्हा कोरडा बहरून गेलो!
आज कैशी आपुली ही भेट ताटातूट झाली?
भेटतांना ऐन वेळी मी कुठे हरवून गेलो?
मी चुका केल्या तरीही काय हे नाही परेसे?
मी करोडो माणसांची अंतरे उजळून गेलो!
जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला-
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो!
- सप्तरंग, सुरेश भट
मी अश्रूंच्या डोहामध्ये बुडलो नाही

मी अश्रूंच्या डोहामध्ये बुडलो नाही
तसा वेदनेला ही मी आवडलो नाही
अता किनारे आणि बंधने कशास मजला
पापण्यांत जर कधी कुणाच्या अडलो नाही
मान्य मला मी इथे यायला नकोच होते
उजाड स्वप्ने बघून ही गडबडलो नाही
मी सूर्याचे वार झेलले छाती वरती
कधी सावलीआड स्वतःच्या दडलो नाही
दूर तुला जाताना येथे पहात होतो
निघून गेले प्राण तरी तडफडलो नाही
फूल कसे हे फुलण्या आधी सुकून गेले
कलेवरावर कधी मनाच्या रडलो नाही
काल भेटली तेव्हा ती पूर्वीगत हसली
मी ही अन रडताना मग अवघडलो नाही
शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या
हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही
- सुरेश भट
मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे

मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे..
लागुनि थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे..
कापर्‍या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे, पुन्हा तू पेटवावे..
रे तुला बाहुत माझ्या, रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे, तू मला बिलगून जावे…

- सुरेश भट
मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग…
त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भंग…
दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रुपरंग…
गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग…
ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग…
काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग….

- सुरेश भट
तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे

तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे
बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे
उसळती हृदयात माझ्या, अमृताच्या धूंद लाटा
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे
ओठ अजूनि बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे

- सुरेश भट
उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे,
अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे…
उगीच वेळ सारखी, विचारतास जाय तू,
पून्हा पून्हा मिठीतही शहारतोस काय तू…
अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला,
अजून पाकळ्यातला मरंदही नही संपला…
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे….
अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी…
उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे,
अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे…

- एल्गार, सुरेश भट
हासताना प्राण गेला का तुला आले रडे?

हे पहा हे लोक सारे कोरडेच्या कोरडे!
का अशी मागून ही
ढाळशी तू आसवे?
संपलो केव्हाच मी
त्या तुझ्या स्वप्नासवे.
तारकांनाही न आता खूण माझी सापडे!

तू असा छेडू नको
अंतरीचा जोगिया;
हो चिता माझी पुन्हा
लागली जागावया.
ही पहा ही राख माझी वारियासंगे उडे!

एकदा नेञी तुझ्या
चांदणे मी वेचले;
एकदा ओठी तुझ्या
गीत माझे गुंफिले.
आज अस्थाईच माझी अंतऱ्यापाशी अडे!

- सुरेश भट
मी फूल तृनातील इवले

जरी तुझिया सामर्थ्याने
ढळतील दाही दिशा
मी फूल तृनातील इवले
उमलणार तरीही नाही...

शक्तिने तुझिया दिपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातिल गाणे हसरे ?

जिंकिल मला दवबिंदू
जिंकिल तृनाचे पाते
अन् स्वतास विसरुनी वारा
जोडील रेशमी नाते...

कुरुवाळीत येतील मजला
श्रावणातिल जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारा...

रे तुझिया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन् रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुम्फावे?

शोधित धुक्यातून मजला
दवबिंदू होवुनी ये तू
कधी भिजलेल्या मातीत
मृदु सजल सुगन्धित हो तू !

तू मलाच विसरुनी यावे
मी तुझ्यात मज विसरावे...
तू हसत मला फूलवावे
मी नकळत आणि फूलावे.....

जिप्सी - मंगेश पाडगावकर
चिंतातुर जंतू!

"निजले जग; का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला |
काय म्हणावे त्या देवाला – "वर जाउनि म्हण जा त्याला" || १ ||
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" || २ ||
"हिरवी पाने उगाच केली झाडांवर इतकी का ही |
मातित त्यांचे काय होतसे?" "मातिस मिळुनी जा पाहीं!" || ३ ||
"पुराबरोबर फुकटावारी पाणी हे वाहुनि जात |
काय करावे जीव तळमळे" "उडी टाक त्या पूरात" || ४ ||
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
देवा, तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी |
ह्या चिंतातुर जंतूंना एकदा मुक्ति द्या परी ! || ६ ||

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा