आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं,
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं.

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता,
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता.

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो,
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो.

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती,
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं.


कवी - अभिजीत दाते.

No comments:

Post a Comment

Leave your comment here